गडचिरोली : जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 323 प्रलंबित खटले आणि 208 दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. या माध्यमातून एकूण 1 कोटी 66 लाख 37 हजार 452 रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. शिवाय किरकोळ गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 263 प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली निघाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश प्रकरणे (कलम 138, एन.आय.अॅक्ट), कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, बँक व पतसंस्थांची थकीत कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबिल प्रकरणे, फायनान्स कंपनीची कर्ज प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांचा निपटारा करण्यात आला. यासाठी जिल्ह्यात एकूण 9 पॅनल कार्यरत ठेवण्यात आले होते.
जिल्हा न्यायालय गडचिरोली येथील पॅनल क्रमांक 2 वर वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती-पत्नी यांच्यात समझोता होऊन पत्नी नांदायला गेली. या विशेष प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी उभयतांचा सत्कार केला.
सदर लोकअदालतीत पॅनल क्र.1 वर व्हि.एस. खोत, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले. पॅनल क्र. 2 वर एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) यांनी कामकाज पाहिले. गुन्हा कबुलीद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे विशेष न्यायालय ठेवण्यात आले होते. सदर न्यायालयात एस.बी. विजयकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले.
पॅनल सदस्य म्हणून पॅनल क्रमांक 1 मध्ये सुरेखा बारसागडे, विधी स्वयंसेविका व पॅनल क्रमांक 2 मध्ये बालाजी बावने, विधी स्वयंसेवक यांनी कामकाज पाहिले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.किशोर आखाडे, जेष्ठ अधिवक्ता वृंद, समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.