शिक्षक भरतीवरून बेरोजगार संघटना व आझाद पक्षाचे आज आंदोलन

स्थानिकांवर अन्याय झाल्याचा आरोप

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड्, बीएड् धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात आले. प्रसिद्ध झालेल्या यादीत 70 ते 80 टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात आल्याने हा जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांवर अन्याय असल्याचा आरोप बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. हा अन्याय जर थांबला नाही तर बेरोजगार संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरून न्याय मिळवून देईल, असे सांगण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार हे कुणीही बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने यांचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालणार आहे. जोपर्यंत शिक्षणमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचेशी कॉन्फरन्सवर बोलणे होणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या दरवाजातून हटणार नाही, असा इशारा निवेदनातून सीईओंना देण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक जण पात्र असूनसुद्धा भोंगळ कारभारामुळे अपात्र यादीत नाव आले, त्यांना न्याय मिळावा, यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना घेऊन आझाद समाज पार्टी लढा देणार असल्याचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे यांनी दिला आहे.