गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी पुलखल, मुरखळा, मुडझा, कनेरी या गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधल्याशिवाय हा निर्णय घेतल्याने नाराज असलेल्या ग्रामस्थांनी या अन्यायकारक भूमी अधिग्रहणाच्या निषेधार्थ 28 एप्रिलपासून मुरखळाजवळील पुलखलच्या राईस मिलमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी बुधवारी या उपोषणस्थळी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली.
यावेळी अशोक नेते यांना उपोषणकर्त्यांनी निवेदन सादर करून चर्चा केली. यावेळी डॉ.नेते म्हणाले, “गडचिरोली शहरात विमानतळाची हवाई पट्टी व्हावी यासाठी मी विशेष प्रयत्न केले होते आणि अखेर या प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली. हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या प्रक्रियेत शेतकऱ्यांची सुपीक जमीन जात असल्यामुळे त्यांच्या भावना रास्त आहेत. शासनाने याकडे संवेदनशीलतेने लक्ष देत योग्य तोडगा शोधावा, जेणेकरून प्रकल्पही थांबणार नाही आणि शेतकऱ्यांवर अन्यायही होणार नाही,” असे म्हणत शेतकऱ्यांची मागणी शासनाकडे पोहोचविणार असल्याचे सांगितले.

यावेळी शरद ब्राम्हणवाडे, सुधाकर गडपल्लीवार, योगेश सोनुले, चंद्रकला मांदाळे, रुमनबाई ठाकरे, प्रल्हाद म्हशाखेत्री, तुळशीराम बारसिंगे, शुभागी मोहुर्ले, तसेच मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.