मातेनंतर हत्तीच्या हल्ल्यात पितृछत्रही गमावलेल्या भावंडांना मिळाली मायेची ऊब

भाग्यश्रीताईंनी घेतली तिघांचीही जबाबदारी

भामरागड : रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने भामरागड तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घालून तीन निष्पाप लोकांचा बळी घेतला. तालुक्यातील कियर व हिदूर या गावात अक्षरश: दुःखाचा डोंगर कोसळला होता. माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी दोन्ही गावातील मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. एवढेच नाही तर आई-वडीलांचे छत्र गमावलेल्या तीन भावंडांच्या भविष्यातील शिक्षणाची जबाबदारी घेतली.

25 एप्रिल रोजी रानटी हत्तीने कियर येथील गोंगलु रामा तेलामी या इसमावर हल्ला करत त्यांचा जीव घेतला. त्याच्यानंतर त्याच हत्तीने रात्रीच्या सुमारास हिदूर गावात प्रवेश करत पूजेसाठी गावाबाहेर असलेल्या माता मंदिरात जाऊन परत येणाऱ्या लोकांवर हल्ला केला. त्यात राजे कोपा आलामी, महारी देऊ वड्डे आणि वंजे झुरू पुंगाटी या तीन महिला गंभीर जखमी झाल्या. यातील राजे कोपा आलामी यांनी 26 एप्रिल रोजी तर महारी देऊ वड्डे या महिलेने 28 एप्रिल रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तिसरी महिला वंजे झुरु पुंगाटी हिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. मागील 3 एप्रिलपासून तर 26 एप्रिलपर्यंत या रानटी हत्तीने तेलंगानासह महाराष्ट्रात धुमाकूळ घालत पाच बळी घेतले. भामरागड तालुक्यातील इतरही भागात या हत्तीने शेतीसह घरांचेही नुकसान केले आहे. या सर्व लोकांची भेट घेऊन भाग्यश्री आत्राम यांनी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहे.

तीन भावंडांनी गमावले आई-वडिलांचे छत्र

कियर येथील गोंगलू रामा तेलामी यांच्यावर रानटी हत्तीने हल्ला करत ठार केले. गोंगलू यांना एक मुलगा आणि दोन मुली असे तीन अपत्य आहेत. त्या मुलांची आई अगोदरच वारल्याने तिन्ही मुलं सध्या मामा कोमटी पेका कुळयेटी यांच्याकडे आहेत. त्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात वडिलांच्या अशा अपघाती मृत्यूने तिन्ही मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांची छत्रछाया हरपली आहे. आता या तिन्ही मुलांची जबाबदारी भाग्यश्री आत्राम यांनी स्वीकारली असून दोन मुलींना भामरागड येथील आपल्या आश्रमशाळेत आणि मुलाला गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली येथे दाखल करण्याची ग्वाही ताईंनी दिली. त्यामुळे त्यांच्या यापुढील शिक्षणाचा खर्च भाग्यश्री आत्राम उचलणार आहे.