गडचिरोली : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या वेळेत 1 एप्रिलपासून बदल करून सकाळी 7.15 ते दुपारी 1.45 पर्यंत अशी वेळ करण्यात आली आहे. परंतु तापमानात वाढ होत असून येणाऱ्या महिन्यात पुन्हा तापमान वाढणार आहे. त्यामुळे लहान मुलांना त्रास होऊन उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या वेळेत बदल करून ही वेळ दुपारी 12 पर्यंत करावी, अशी मागणी मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले यांनाही निवेदन देऊन शिष्टमंडळाने यासंदर्भात चर्चा केली.
अंगणवाडी केंद्रात विद्युत पुरवठा नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्या वेळेत काम करणे अडचणीचे होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सकाळी 7.15 ते 11.15 ही वेळ आहे. त्या आधारे अंगणवाडी कामकाजाची वेळ सकाळी 7.15 ते दुपारी 12 पर्यंत ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, अर्चना मारकवार, अंगणवाडी सेविका योगीता मुनघाटे, भूमिका बोराटे, मनीषा गडसुलवार, मनीषा लोणारे, अर्चना ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.