
गडचिरोली : जिल्हा पोलिसांच्या सायबर शाखेने जुलै 2025 पासून आतापर्यंत नागरिकांचे हरवलेले आणि चोरी गेलेले 90 मोबाईल शोधून काढले. एकूण 13 लाख 97 हजार 399 रुपये किमतीचे हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना ते मोबाईल देण्यात आले.

सन 2025 या वर्षात आतापर्यंत सायबर शाखेकडून 33 लाख 64 हजार 560 रुपये किमतीचे एकूण 215 मोबाईल फोन शोधून काढत संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
आजकाल तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असते. मोबाईल हाताळताना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमार्फत गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर शाखेकडे नोंदविली जाते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्ह्रांबाबत सतर्क राहून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात असतो.
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशनमार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येतो.
आपला मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी, तसेच आपण देखील जास्तीत-जास्त लोकांपर्यंत या पोर्टलबाबत माहिती पोहोचवून त्यांना मदत करावी. मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेऊन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें किंवा सायबर पोलीस स्टेशन, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 किंवा 1945 येथे संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.
मोबाईल शोधण्याची ही कामगिरी सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि.अरुण फेगडे, पोउपनि. नेहा हांडे, पो.हवा वर्षा बहिरवार, पोअं संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर, सिध्दांत बुजाडे यांनी पार पाडली.
































