एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर येथे 33/11 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे, मात्र निधीअभावी त्याचे बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे परिसरातील 70-80 गावांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कसनसूर परिसरातील सरपंच व ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन ही समस्या दूर करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. (अधिक बातमी खाली वाचा)
सद्यस्थितीत एटापल्ली उपकेंद्रावरून कसनसूर परिसरातील गावांना वीज पुरवठा होत आहे. एटापल्लीचे उपकेंद्र 50 किमी अंतरावर असल्याने पावसाळ्यात वारंवार वादळ-वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांना अनेक दिवस अंधारात राहावे लागते. शाळा, रुग्णालये व शासकीय कार्यालये यावरदेखील गंभीर परिणाम होत आहे.
मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असताना आणि हे काम खनिज निधीच्या कक्षेत असताना तालुक्यातील नागरिकांना निधीअभावी अंधारात राहावे लागत आहे, अशी शोकांतिका गावकऱ्यांनी मांडली. या उपकेंद्राकरिता निधी उपलब्ध करून न दिल्यास परिसरातील ग्रामस्थांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी कसनसूरचे माजी सरपंच सुनील मडावी, वेणारा ईलाकाचे अध्यक्ष सुधाकर गोटा, उपसरपंच मानेवारा देवीदास मट्टामी, उपसरपंच कोटमी महादेव पदा, सरपंच वाघेझरी विलास कोंदामी, सरपंच जवेली बु.अलिशा गोटा, उपसरपंच दमजी हिचामी, माजी उपसरपंच चोखेवाडा लालसु नरोटे, सरपंच घोटसुर साधू कोरामी, माजी सरपंच कसनसूर देवू गावडे, सेवारी पुसू गावडे, उपसरपंच सेवारी बाबुराव पुंगाटी, उपसरपंच वाघेझरी वनिता शेंडे, ग्रामसभा कार्यकर्ते पेंड्री विलास नरोटे, यांच्यासह अशोक इष्टाम, नितीन पदा, रामसू दुग्गा, गंगाराम इष्टाम, सुरेंद्र इष्टाम, अरुण राय, कमल हेडो, मुन्ना पुंगाटी, सिंधू मुहंदा, छाया कोवासे, बेबी हेडो हे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.