देसाईगंज : जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाचा फटका अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना बसला आहे. पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी तालुक्यातील कोंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत हताश झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी तातडीने पंचनामे करत नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या सूचना संबंधित तलाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, दादाजी मेश्राम, भगवान मेश्राम यांच्या शेतीची गजबे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यपरिस्थितीत शेतकरी हताश आहेत. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी मेहनतीने वाढवलेली पिके वाया गेली आहेत. तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावल्या गेल्यासारखी स्थिती आहे. या अवकाळी पावसाने फक्त धानच नव्हे तर सर्वच पिकांना फटका बसला आहे, मात्र जिल्ह्यात मुख्य पीक धान असल्यामुळे त्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदार गजबे यांनी देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यांतील तहसीलदार व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, 24 तासात बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, अशी सूचना केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
या पाहणी दौऱ्यात माजी आमदार गजबेंसोबत तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तलाठी ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, शेषराव नागमोती, भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, सुरेश झिलपे, विनायक पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे, भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, दादाजी मेश्राम, भगवान मेश्राम या बाधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती उपस्थितांना दिली.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
शासन आपलेच असल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही गजबे यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तात्काळ निधी मंजूर करावा, अशीही मागणी त्यांनी केली. स्थानिक प्रशासनही शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ कार्यवाहीस सज्ज असल्याचे आढळले. सरकारच्या सकारात्मक निर्णयाने शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.
































