अहेरी : तालुक्यातील मौजा कासमपल्ली, गुर्जा बुज., वेडमपल्ली आणि एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही, बिड्री, येमली या मार्गाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एसटी महामंडळाची बस सुरू झाली. माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी नारळ फोडून आणि हिरवी झेंडी दाखवून या बसफेरीचा शुभारंभ केला. यावेळी हर्षवर्धनबाबा आणि डॅा.मिताली आत्राम यांनी त्या बसमध्ये बसून काही अंतर प्नवास करत नागरिकांच्या आनंदात ते सहभागी झाले. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

आधी सदर गावांकडे जाणारा रस्ता खूपच खराब होता. त्यामुळे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सन 2019 मध्ये विधानसभेचे प्रतिनिधीत्व सुरू केल्यानंतर या रस्त्याच्या दुरूस्तीचे नियोजन केले. सन 2020 ते 2021 या वर्षामध्ये हा रस्ता मंजुर करण्यात आला. त्यानंतर सदर रस्त्याचे बांधकाम तीन वर्षात पुर्ण झाल्यानंतर आ.आत्राम यांनी अहेरीपासून कासमपल्ली, गुर्जा बुज., वेडमपल्ली, कोंदावाही, बिड्री, येमली या मार्गाने एसटी महामंडळाची बस सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून अखेर ही बस सुरू करण्यात आली. त्यामुळे त्या मार्गावरील 10 ते 12 गावातील नागरिकांना या बससेवेचा लाभ मिळणार आहे.
या बसच्या शुभारंभप्रसंगी डॉ.मिताली आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कासमपल्लीचे पाटील जोगा मडावी, मेडपल्ली ग्राम पंचायतीचे सदस्य यशवंत कोडापे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबुराव तलांडी, सुरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडी, सुनील नैताम, तुकाराम ईश्टम, बिच्चू गावडे, रैनु गावडे, विलास वेलादी यांच्यासह मौजा कासमपल्ली गावातील महिला व पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.