मनरेगाच्या मजुरांचे थकीत हप्ते आणि 100 दिवस रोजगार द्या

खा.डॉ.नामदेव किरसान यांची मागणी

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस सरकारने सुरु केलेली महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजपर्यंत रोजगार निर्मिती झाली आहे. मात्र सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या अनेक मजुरांचे मजुरीचे हप्ते थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचे थकीत हप्ते तातडीने द्या, अशी मागणी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी बुधवारी संसदेत केली.

त्याचबरोबर शेतात खोदण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे थकीत असलेले हप्ते सुद्धा तातडीने देण्यात यावे, मनरेगा योजनेतून वार्षिक 100 दिवस रोजगार देण्याची हमी दिल्या जाते, मात्र प्रत्यक्षात 50 टक्के दिवसच रोजगार निर्मिती होत आहे, अशा ठिकाणी पूर्णपणे 100 दिवस रोजगार देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी खासदार डॉ.किरसान यांनी यावेळी केली.