अहेरी : मागील अनेक वर्षांपासून या भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याशिवाय इतर वेगवेगळ्या विभागांच्या कामांकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. ही कामे वेळीच मार्गी लावा, आता हयगय व दुर्लक्षितपणा खपवून घेणार नाही, अशी तंबी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्नुषा डॉ.मिताली आत्राम यांनी तहसीलच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अहेरी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, शाखा प्रमुख, कर्मचारी यांना पाचारण केले. डॉ.मिताली आत्राम यांनी अहेरी येथील प्राणहिता ते मुख्य चौकापर्यंतचा रस्ता त्वरीत बनविण्यात यावा, अहेरी ते महागाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, राष्ट्रीय महामार्ग आष्टी ते लगाम-आलापल्ली आणि आलापल्ली ते सिरोंचा महामार्गाचे काम त्वरीत मार्गी लावावे, अहेरी येथील वीज पुरवठ्याची समस्या सुरू असल्याने नव्याने उभारलेले व काम पूर्णतः झालेले 33 के.व्ही. उपकेंद्र तात्काळ सुरू करावे, अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात पदांची तात्काळ भरती करून रुग्णालय सुरू करावे, गोरगरिबांसाठी स्मार्ट मीटर परवडण्यासारखे नसून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे अनुदान तात्काळ वितरीत करावे, कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, असे विविध प्रश्न लावून धरले आणि आठवड्याभरात हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंतीवजा सूचना केली. यावर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनीही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन कामात निष्काळजीपणा, दुर्लक्षित झाल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी डॉ.मिताली आत्राम यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दीवार, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, राजेश्वर रंगुलवार, नगरसेविका ज्योती सडमेक, रतन दुर्गे, जावेद अली आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध
स्मार्ट मीटर हे गोरगरिबांसाठी परवडण्यासारखे नसून प्रीपेड स्मार्ट मीटर अहेरी विधानसभा क्षेत्रात बसविण्यात येऊ नये, त्यासाठी आमचा तीव्र विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार तथा वीज वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना यावेळी डॉ.मिताली आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दिले.