तीन महिलांसह एका ट्रकचालकाला पुराच्या पाण्यातून काढत दिले उपचार

आपदग्रस्तांच्या मदतीला धावली बचाव पथके

गडचिरोली : जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातील विसर्गामुळे नदी नाले दुथळी भरून वाहात आहेत. यातच आपदग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची बचाव पथके धावून जात आहेत. पुरात वेढलेल्या आणि पुरामुळे उपचार घेण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्याने अडचणीत सापडलेल्या चार प्रकरणात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी एसडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य आणि आपदा मित्र यांचा समावेश असलेल्या बचाव पथकांच्या तत्परतेने दुर्घटना टाळण्यात यश आले.

तेलंगणा राज्यातील आशिफाबाद येथील कलावती (20 वर्ष) ही गर्भवती महिला सिरोंचा तालुक्यातील चिक्याला येथे नातेवाईकाकडे आली होती. मंगळवारी रात्री अचानक त्यांना प्रसुतीवेदना होऊ लागल्या. परराज्यातून आलेल्या असल्याने जिल्हा प्रशासनाकडील मान्सूनपुर्व नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र रात्री उशिरा याबाबत माहिती मिळताच स्थानिक महसूल व आरोग्य बचाव पथकाने वेळीच त्यांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढत चिक्याला ते परसेवाडा आणि तेथून प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडा येथे स्थलांतरीत केले. वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली मध्यरात्री 1.45 वाजता त्यांची नॉर्मल प्रसुती झाली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात बुधवारी गडचिरोली तालुक्यातील माडेमूल येथील कल्पना सचिन परसे (32 वर्ष) यांना सर्पदंश झाल्याच्या संशय वाटत होता. पण पुराच्या पाण्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणे शक्य होत नव्हते. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा बचाव पथकाच्या टीमने पुराच्या वेढ्यामुळे रस्ता बंद असताना मोटार बोटच्या मदतीने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढून गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

याशिवाय मुलचेरा तालुक्यातील मौजा वेंगणुर येथील पायल गावडे (23 वर्ष) या गर्भवतीला छातीत दुखत असल्याने तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे स्थानिक आशा वर्कर यांनी कळविले. त्यानंतर सदर महिलेला मुलचेरा व एटापल्ली येथील संयुक्त आरोग्य व महसूल पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथे भरती करण्यात आले.

चौथ्या प्रकरणात गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील पाल नदीवरच्या पुलावरील पाणी मंगळवारी संध्याकाळी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली होती. पण नंतर पाणी वाढल्याचा अंदाज न आल्याने एका ट्रकचालकाने रात्री पुलावरील पाण्यातून ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्येच ट्रक बंद पडला. सकाळी त्याने ट्रकच्या काचावरील वायपर सुरू करत आपण वाहनात अडकल्याचा संदेश दिला. याची माहिती मिळताच तहसीलदार, गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी एसडीआरएफ आणि पोलीस पथकाच्या मदतीने वाहनचालक राजकुमार कृष्णमूर्ती, (रा.तामिळनाडू) यांना सुखरूप बाहेर काढले.

खड्डे बुजविण्यासाठी अपर जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

जिल्ह्याच्या दक्षिण भागात महाराष्ट्र-तेलंगाणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलाजवळच्या वांगेपल्ली या गावात रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर बांधकाम विभागाला सूचित करून जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने बोल्डर, गिट्टी टाकून तात्काळ तेथील खड्डे बुजवून घेतले. यासोबतच या भागात रस्त्यावर पडलेले इतरही खड्डे बुजविण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाला दिले.