आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून हत्तींच्या कळपाने थैमान घालून मका आणि उन्हाळी धान पिकांचे मोठे नुकसान केले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी शेताच्या बांधावर पोहोचून नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळपात सुमारे 32 हत्ती असून ते दिवसा जंगलात राहतात आणि संध्याकाळी शेतांमध्ये धुडगूस घालतात. त्यामुळे मका आणि धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासंदर्भात मा.खा.डॉ.नेते यांनी मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना केल्या.
हत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी हुल्ला टिम
हत्तींचा गावात प्रवेश रोखण्यासाठी पश्चिम बंगालमधून हु्ल्ला टिम बोलवून ती तैनात करण्यात आली आहे. रात्रभर मशाली पेटवून आणि भाले घेऊन या पथकातील सदस्य गस्त घालण्याचे काम करत आहे. वनविभागानेही सतत गस्त घालण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आहे. गावात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मी तुमच्यासोबत आहे– डॉ.नेते
गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत जंगलात न जाणे, शक्यतो एकटे न फिरता गटानेच बाहेर पडणे, तसेच हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन मा.खा.डॅा.नेते यांनी केले. गावकऱ्यांनी चिंता करू नये, मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन नेते यांनी दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, क्षेत्र सहाय्यक वाय.के.दोडके, वनरक्षक एन.बी. भर्रे, युवा नेते विकास पायदलवार, शरद भोयर, डाकराम कुंबरे, योगाजी कुकडकर, गंगाधर पात्रीकर, सुधाकर बनकर, सुदाराम पात्रीकर, धनपाल बांबोळे, विलास किरनापुरे, खेमराज पात्रीकर, आशिष पात्रीकर, युवराज पात्रीकर,गोपाल वट्टी, तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी, शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.