भावाचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांच्या मारहाणीतच!

दलित युवकाच्या मृत्यूप्रकरणी भाऊ-बहिणीचा आरोप

गडचिरोली : रात्रीच्या सुमारास मित्रांसोबत जंगलात गेलेल्या भावाला वनकर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिक पोलिस पाटलांनी तक्रार दिल्यास तुम्हालाही कारागृहात जावे लागेल, अशी भिती दाखविल्याने यासंदर्भात कुठलीही तक्रार आम्ही केली नाही. मात्र आमचा भाऊ रेड्डी बुचय्या जाडी याच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्या मृत दलित युवकाचे भावंडं चिन्नालचन्ना बुचय्या जाडी व दुर्गु जिमडे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना मृतकाचा भाऊ चिन्नालचन्ना जाडी याने सांगितले की, 24 जूनच्या रात्री भाऊ गावातील इतर सहकाऱ्यांसोबत जंगलात गेला होता. यादरम्यान गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पहाटेच्या सुमारास अंगावरील जखमा बघून सविस्तर विचारणा केली असता त्याने वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. दरम्यान तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलिस पाटील व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी वाहनात बसवून पोलिस ठाण्यात नेले. यादरम्यान पोलिस पाटीलांनी तुम्ही याची तक्रार दिल्यास तुम्हीच फसून कारागृहात जाल, अशी भीती दाखवली. या भितीपोटी आम्ही कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र मृत्यूपूर्वी भाऊ रेड्डी बुचम्म जाडी याने भावाला वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यामुळे भावाच्या मृत्यूसाठी त्यांनी केलेली मारहाणच कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मृतकाच्या पिडीत कुटूंबियांनी केली.

पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, यशवंत त्रिकांडे, अरुण शेडमाके, ईश्वर गावडे, साईकिरण गड्डम, गौरव उलपूलवार आदी उपस्थित होते.