गडचिरोली : कठाणी, वैनगंगा या नद्यांसह इतर काही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या अंधारात रेतीचा उपसा केला जात आहे. गडचिरोलीसह आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यात सुरू असलेल्या या अनधिकृत रेती उपस्यातून मोठ्या प्रमाणात रेती नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पोहोचवली जात आहे. त्यामुळे या रेती तस्करांना कोणाकोणाचे पाठबळ आहे? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
आरमोरी तालुक्यातील देऊळगाव आणि डोंगरसावंगी नदीपात्रातून मध्यरात्री पोकलेन मशीनद्वारे वाळूचा उपसा करून चोरी करणाऱ्यांना आठवडाभरापूर्वी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मात्र या वाळू तस्करीतील सूत्रधारांवर कारवाई झालेली नाही. दोन्ही ठिकाणांवरून दोन पोकलेन मशीन, एक रेतीचा ट्रक व उपसा केलेली वाळूअसा एकूण 1 कोटी 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्रमुख आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. (अधिक बातमी खाली वाचा)

गेल्या अनेक महिन्यांपासून आरमोरी तालुक्यातील विविध नदीपात्रांमधून वाळू चोरी केली जात असताना तहसील कार्यालयाची यंत्रणा जणूकाही त्यांना सर्व नियम मोडण्याची सूट दिली आहे अशा पद्धतीने वागून कारवाई करायला तयार नाही. तहसीलदार मॅडम मुख्यालयी राहात नाही हे निमित्तच आहे. त्या मुख्यालयी राहिल्या असत्या तरी कारवाई झाली नसती, असे लोक खुलेआम सांगतात. हीच स्थितीत गडचिरोली तालुक्याची आहे. गडचिरोलीच्या तहसीलदारांचे रेट आम्हाला माहित आहे, त्यामुळे आमच्यावर कारवाई होणारच नाही, तुम्हाला किती गाड्या वाळू पाहिजे तेवढे फक्त सांगा, असे वाळू तस्करी करणाऱ्यांची माणसं मोठ्या विश्वासाने सांगतात. वाळू तस्करांना रोखण्यासाठी लावलेले नाकेसुद्धा नामधारी आहेत. त्यांनी आतापर्यंत कोणतेही वाळूने भरलेले वाहन रोखलेले नाही किंवा त्यांची साधी चौकशीही केलेली नाही. त्यामुळे आरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईप्रमाणे गडचिरोली पोलीस ठाण्याने एखादी कारवाईची झलक दाखवावी, अशी अपेक्षा गडचिरोलीकर करत आहेत. गडचिरोलीचे ठाणेदार म्हणून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अनेक महिन्यांपासून सुरू आहे वाळू चोरी
गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यासह देसाईगंज तालुक्यात सावंगी, कुरूडसह इतर काही घाटांमधून गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रीच्या सुमारास रेतीचा उपसा करून सर्रास वाळूने भरलेले टिप्पर जात आहेत. वास्तविक संध्याकाळी 6 वाजतानंतर वाळू काढणे किंवा वाहतूक करणे नियमबाह्य आहे. मात्र तहसीलदार आणि त्यांच्या अधिनस्त यंत्रणेचे वाळू माफियांसोबत असलेल्या साटेलोटे यातून हे सर्व राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात यावर्षी एसडीओ किंवा त्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कुठेही वाळू तस्करांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे वाळू तस्करांना सर्वांनीच अभय दिले की काय, अशी चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये केली जात आहे.