गडचिरोली : जिल्ह्यातील 50 तलावांचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथे पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, सरपंच सुप्रिया तुलावी, उपसरपंच मंगेश कराडे, ग्रामसेविका आरती भोयर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या सहकार्याने या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे गावागावात करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ.परशुराम खुणे, डॉ.प्रणय खुणे, नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम लोकसभागातून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवायचा आहे. त्यामुळे या कामात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी डॅा.प्रणय खुणे यांनी केले. 50 तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा खूप मोठा लाभ होणार असल्याचे यावेळी नाम फाउंडेशनचे उमेश पाटील म्हणाले.