गडचिरोली : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदींच्या अभियंत्यांसह परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) उपस्थितीत एक समन्वय बैठक घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता निता ठाकरे (मोहोड) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सर्व कामे योग्य प्रकारे मार्गी लावण्यासाठी आपसात समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसातील आपत्ती व्यवस्थापन, रस्त्यांवरील सुरक्षित प्रवास, जिल्ह्यात पर्यटन वाढविण्यासाठी काय-काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली. तसेच पुलांची दुरूस्ती, आदिवासीबहुल क्षेत्रातील आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील महसूल मंडळ कार्यालयांची अवस्था, आश्रमशाळांची अवस्था आदींची स्वत: पाहणी करून ते त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

या बैठकीत जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधा निर्माण करण्यासोबतच ती स्थळे अधिक आकर्षित कशी करता येतील यावर भर देण्यात आला. वृक्षारोपणाचे उद्दिष्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचे यावरही चर्चा झाली. पावसाळ्यादरम्यान प्रत्येक पंधरवड्यातून एकदा ही समन्वय बैठक घेण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, परिवहन अधिकारी उपस्थित होते.