वाहतूक व्यवस्थेतील शिस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

उपाययोजना करण्याचे निर्देश

गडचिरोली : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाहतूक व्यवस्थेत शिस्त, नियंत्रण व सुरक्षितता आणण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बैठक घेतली. यावेळी वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आणि नियमानुसार सर्वांवर कारवाई करण्यासोबत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतूक समस्येचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, तसेच वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस अधिकारी, तसेच शहर पोलीस व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत करण्याच्या दृष्टीने शहरातील वेगमर्यादा पालन, अल्पवयीन मुलांचे धोकादायक वाहनचालन, राँग साईड वाहनचालन, दुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास, तसेच जड व मालवाहू ट्रकच्या शहरातील हालचाली यावर कडक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.

शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालयाचा परिसर, वस्ती भाग व वर्दळीच्या चौकांमध्ये वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमित तपासणी करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी वाहतूक नियंत्रण व पोलीस यंत्रणेला दिले. अपघातप्रवण व वर्दळीच्या ठिकाणी आवश्यक तेथे रमलर स्ट्रिप्स बसविणे, सूचना फलक व स्पीड ब्रेकर अधिक प्रभावी करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

अल्पवयीन मुलांकडून दुचाकी व चारचाकी वाहने चालवण्याच्या वाढत्या घटनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पालक, शाळा-महाविद्यालये व पोलीस यंत्रणांनी समन्वयाने जनजागृती करण्याचे, तसेच वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन वाहनचालकांवर आणि त्यांना वाहन देणाऱ्या पालकांवरही नियमानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

बेदरकार व नियमबाह्य वाहनचालनामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने अशा वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यास त्यांनी सांगितले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सातत्याने करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे संख्याबळ वाढविणे, तसेच मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा नियमितपणे कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

शहरातील जड वाहनांची, विशेषतः ट्रकची, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर, वेळापत्रक निर्धारण व आवश्यक त्या ठिकाणी निर्बंध लावण्याबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला वाहतूक पोलीस, शहर पोलीस व संबंधित अधिकारी उपस्थित होते.