गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यावश्यक आहे. निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवारी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पंडा बोलत होते. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विभागनिहाय झालेले निधीचे वितरण आणि खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. ज्या विभागांनी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली होती, परंतु प्रत्यक्षात खर्च अल्प प्रमाणात केल्याचे निदर्शनास आले, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मंजूर निधीचा योग्य वापर करून मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
प्रत्येक विभागाने मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर आणि कोणत्या टप्प्यावर झाला आहे, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. मार्च अखेरपर्यंत निधी खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी विभागनिहाय प्रगतीचा सतत आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांना सर्व विभागांना मंजूर निधीचे संपूर्ण वितरण झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ज्या विभागांनी अपेक्षेप्रमाणे निधी खर्च केलेला नाही, अशा विभागांना लेखी पत्राद्वारे कारणे विचारण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, काम अपूर्ण असल्याचे कारण देऊन निधी खर्च न करणाऱ्या विभागांना पुढील आर्थिक वर्षात निधी वितरणात मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे सर्व विभागांनी कामांची गती वाढवून मंजूर निधी वेळेत खर्च करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी विभागनिहाय माहितीचे सादरीकरण केले. बैठकीला संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
































