एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 191 बटालियनचा स्थापन दिवस दि.25 मार्चला उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरी कृती कार्यक्रमांतर्गत गावकऱ्यांना सौर दिवे, सायकली, स्लास्टिक खुर्च्या, स्प्रे पंप, ब्लँकेट आणि विविध खेळांचे साहित्य वाटण्यात आले.

191 बटालियनचे कमांडिंग आॅफिसर सत्यप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपकमांडंट उमाशंकर प्रसाद, सहाय्यक कमांडंट मोहित कुमार, प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टाचे डॉ.पवनकुमार राहरेकर, गट्टा पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक नागेश जावळे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पू.बिरसा मुंडा यांच्या पूजेने झाले. याप्रसंगी गट्टा, जांबिया, गट्टागुडा, मोडस्के, जंजावडी, मोहंडी, गोरगुट्टा, झरेवाडा इत्यादी गावातील 300 ग्रामस्थांना सौर दिवे, सायकली, कॅरम बोर्ड, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट उपकरणे, प्लास्टिक खुर्च्या, स्प्रे पंप आणि ब्लँकेट इत्यादींचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.पवनकुमार राहरेकर यांच्या पथकाने ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी केली. तसेच सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी गट्टा शाळेच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, स्वयंरोजगारासाठी आणि तरुणांना खेळात रस निर्माण होण्यासाठी हे साहित्य दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.