गडचिरोली : जिल्ह्यातील शोषित, वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या व आपल्या मानवी न्याय हक्कांपासून वंचित असलेल्या आदिवासी समाजात संविधानिक, न्यायिक अधिकाराबाबत जनजागृती करून त्यांचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणणारे युवा वकील बोधी रामटेके यांचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांनी सत्कार केला.

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेऊन वास्तव्य करणारे अॅड.रामटेके यांचे गडचिरोलीतील वंचितांकडे नेहमी लक्ष असते. रेगडी जवळील अतिसंवेदनशील वेंगणूर या गावासह चामोर्शी, मुलचेरा तालुक्यातील सुरगाव, गरंजी, पुल्लीगुडम या गावांच्या अनेक समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. ॲड.बोधी रामटेके यांनी त्यांच्या पाथ फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांसोबत या गावांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फिरून आकडेवारी गोळा केली. उच्च न्यायालयात त्याचा यशस्वी पाठपुरावा केला. या समस्यांचे पत्रच उच्च न्यायालयाला पाठवले. न्यायालयाने या पत्रातील समस्या पाहता त्याची याचिका दाखल करून घेतली. सरकारला उच्च न्यायालयाने जाब विचारला. झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सहा महिन्यांच्या आत या गावात रस्ता, तसेच पुल बनवण्याचे आदेश दिले होते.
अॅड.बोधी रामटेके यांनी या गोरगरीब, शोषित वंचित नागरिकांना न्यायालयीन मार्गाने यश मिळवून दिले. नक्षलग्रस्त भागात संविधानाचे शस्त्र हातात घेऊन एका तरुण वकिलाने जिंकलेला हा लढा गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. आज वेंगनूर, सुरगाव पल्लीगुड्डम या गावांचा कायापालट होत आहे. याकरिता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे. बोधी रामटेके यांच्या प्रेरणादायी या कार्याची दखल घेऊन मानवाधिकार संघटनेतर्फे अॅड.बोधी रामटेके यांची आई, वडील प्राचार्य श्याम रामटेके यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरवपूर्ण सत्कार केला.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मडावी, प्रमोद आसूडकर व पदाधिकारी उपस्थित होते.

































