गडचिरोली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करून असलेल्या हजारो कुटुंबांना त्या जागेचा मालकी हक्क मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. या अतिक्रमणधारक नागरिकांना सुधारित शासन निर्णयानुसार तातडीने घरांचे कायदेशीर मालकी हक्क (पट्टे) मिळावेत, यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत नवीन जीआरनुसार तातडीने कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्याचे आश्वासन दिले.
आरमोरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गोरगरीब कुटुंबे शासकीय जमिनीवर घरे बांधून अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. मात्र, जागेचा मालकी हक्क नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे, बँकेकडून कर्ज मिळवणे किंवा घराची कायदेशीर खरेदी-विक्री करणे अशक्य झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या बैठकीत अतिक्रमणधारकांची यादी अंतिम करण्याचे ठरले होते, परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती.
सुधारित शासन निर्णयाचा आधार
आता शासनाने पूर्वीच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करून नवीन सुधारित शासन निर्णय निर्गमित केला आहे. याच नवीन निर्णयाचा आधार घेत कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. “शासनाने आता सर्व अडथळे दूर केले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, पात्र लाभार्थ्यांची यादी तपासून पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी,” अशी मागणी गजबे यांनी केली.
शिष्टमंडळाने मांडलेली भूमिका आणि नागरिकांची गरज लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे मान्य केले. त्यांनी संबंधित तहसीलदारांना आणि महसूल विभागाला पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम करून पट्टे वाटपाची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश देणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या घराचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू पेट्टेवार, भाजप तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरीचे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, शहराध्यक्ष विलास पारधी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय हेमके, कुणाल पिलारे, शुभम निंबेकर, सुरज कारकूरवार, युगल सामृतवार, गोविंदा भोयर, जितेंद्र ठाकरे, मिथुन मडावी, चामेश्वर मैंद, तसेच पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.