कारगिलवीरांना अभिवादन करण्यासाठी स्मृतिस्थळी जमले शेकडो गडचिरोलीकर

विजय दिवशी माजी सैनिकांचा सत्कार

गडचिरोली : भारतीय भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत जम्मू-काश्मिरमधील कारगिल क्षेत्रात युद्ध पुकारलेल्या पाकिस्तानला पराजित करून विजय मिळण्याच्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाले. या रौप्य महोत्सवी विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धातील वीरगती प्राप्त जवानांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (दि.25) शेकडो लोकांनी गडचिरोलीतील कारगिल स्मृतिस्थळी हजेरी लावली. गडचिरोलीकर युवा वर्गात मोठी क्षमता आहे. त्यामुळे केवळ पोलीस सेवाच नाही, तर विविध संरक्षण दलाच्या भरतीमध्ये त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांचा भरती मेळावा गडचिरोलीत होण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती यावेळी लॅायड्स मेटल्सचे संचालक कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांनी याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना दिली.

कारगिल दुर्गा उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आणि लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षी कारगील युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांनाही कारगिल स्मारकावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसह त्यांची गडचिरोली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कारगिल चौक येथे सर्व माजी सैनिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

याप्रसंगी स्मारकावर पोलीस अधीक्षक निलोत्पल, कारगिल युद्धातील कर्नल विक्रम मेहता (निवृत्त), कर्नल रामनाथ स्वामी (निवृत्त), नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रकाश ताकसांडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी जिल्ह्यातील माजी भारतीय सैनिक आणि कारगील युद्धात सहभागी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने कारगिल स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धकाते, लॅायड्स मेटल्सच्या सीएसआर उपक्रमांचे व्यवस्थापक फगुआ ओरोन, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यशवंत सिंगारा, सुभेदार वंजारी, सुभेदार राम प्रताप, सुभेदार जगदेव राऊत, सुभेदार निरंजन दास, सुभेदार विनोद कुमार, नायब सुभेदार राहुल सिंग, हवालदार महादेव वासेकर, हवालदार सुभाष नरोटे, हवालदार रमेश किट्टे, हवालदार प्रवीण तायडे, हवालदार रणजित सिंग, नायक कैलाश सीडाम यांच्यासह ईश्वर राऊत, सोमनाथ वैरागडे, डॉ.नरेश बिडकर, सुनील देशमुख, रेवनाथ गोवर्धन, प्रकाश भांडेकर आदींनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

यावेळी गोंडवाना सैनिकी विद्यालय, महिला महाविद्यालय, पोद्दार स्कुल, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी प्राथमिक शाळा आदी शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उदय धकाते, निवृत्त सुभेदार ऋषी वंजारी, माजी सैनिक महादेव वासेकर, राजू भांडेकर, निवृत्त सुभेदार नामदेव प्रधान, दिगंबर गेडाम, ईश्वर राऊत, सुचिता धकाते, विद्या कुमरे, वनिता धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, विक्की रामटेके, मधुकर चिंचघरे आदीनी परिश्रम घेतले. यावेळी लॉयड् मेटल्सकडून सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.