13 आत्मसमर्पित जोडप्यांचा शाही थाटात सामूहिक विवाह

मुख्यमंत्री, सहपालकमंत्री वऱ्हाडी

गडचिरोली : कधीकाळी जंगलात भटकंतीचे जीवन जगणाऱ्या आणि ज्यांच्या जीवनात विवाह हा समारंभ नव्हे तर केवळ औपचारिकता ठरणाऱ्या 13 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा शाही थाटातील विवाह शुक्रवारी गडचिरोलीत पार पडला. विशेष म्हणजे या समारंभाला वऱ्हाडी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री अ‍ॅड.आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन आणि डॉ.मिलिंद नरोटे, नक्षलविरोधी अभियानाचे डीआयजी अंकित गोयल, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, माजी आमदार कृष्णा गजबे अशा मान्यवरांनी हजेरी लावून हा सोहळा अविस्मरणीय केला. (सविस्तर बातमी खाली वाचा)

गडचिरोली पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात थाटामाटात झालेल्या या समारंभातील अर्ध्याहून अधिक जोडपी लॅायड्स प्रकल्पात कार्यरत आहेत. त्यामुळे पोलिसांसोबत लॅायड्स व्यवस्थापनानेही या समारंभासाठी हातभार लावला. त्यामुळे या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवल्याचे दिसून आले.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ‘ग्रीन स्टील’चे स्वप्न साकार करण्यासोबत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या जीवनातील आनंदाचा निर्देशांक देखील वाढवत असल्याने या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत संपन्न झालेल्या या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यादत एलएमईएलने नवविवाहित जोडप्यांना मंगळसूत्र, गृहोपयोगी वस्तू दिल्या. एलएमईएलच्या लोक सक्षमीकरणाच्या धोरणाला अनुरूप हा उपक्रम होता.

सी-60 जवानांच्या सत्कारप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस लॅायड्सच्या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले, “लॉयड्स मेटल्सचं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार दिला, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. एकीकडे महाराष्ट्र शासनाचे नक्षल आत्मसमर्पण संदर्भात धोरण तर आहेच, पण दुसरीकडे लॉयड्ससारखे उद्योग त्यांच्या पुनर्वसनाला हातभार लावत आहेत. पुढच्या काळात आपल्याला गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून तसेच रोजगारयुक्त जिल्हा बनवायचा आहे” असे ते म्हणाले.