गडचिरोलीतील धार्मिक स्थळांच्या पवित्र मातीचा सुगंध दरवळणार नवी दिल्लीत

राजधानीत देणार आपलेपणाची भावना- खा.नेते

गडचिरोली : देशाच्या जडणघडणीत अनेक महान लोकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी, तसेच विविधतेने नटलेल्या या देशाच्या समृद्धतेची साक्ष देणारी अनेक भागातील माती, श्रद्धास्थान असणाऱ्या धार्मिक स्थळांची माती अमृत कलशाच्या माध्यमातून देशाची राजधानी नवी दिल्लीत गोळा केली जात आहे. तेथील अमृत वाटीका बगिच्यात या मातीचा सुगंध दरवळून तो सर्वांना आपलेपणाची भावना देईल, असा विश्वास खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील धार्मिक स्थळांमधील मातीने भरलेले अमृत कलश बुधवारी गडचिरोलीत एकत्रित करून त्यांचे पूजन करण्यात आले. मेरी माटी, मेरा देश या उपक्रमाच्या माध्यमातून देशप्रेम, देशभावना जागृत करत खऱ्या अर्थाने देशाला एकत्रित करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे खा.नेते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते. ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळावरून गोळा केलेली माती या कलशात गोळा केली होती.

सर्वप्रथम शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॅा.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद संकुल शाळा, कॉम्प्लेक्स या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने वाजतागाजत १२ कलश नियोजन भवनात पोहोचविण्यात आले. याप्रसंगी धरती मातेचरणी पंचप्राण शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तर संचालन संध्या चिलमवार यांनी केले.

याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अमित फुंडे, चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, न.प.उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, तसेच १२ तालुक्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते.