गडचिरोली : जिल्हाभरातील सर्व जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांमध्ये सोमवारी (दि.23) नवीन शालेय सत्राचा शुभारंभ शाळा प्रवेशोत्सवाने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. मुरखळा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांचा उत्साह वाढविला. जिल्ह्यातील शाळा इमारती आणि सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात जिल्हा शैक्षणिक सुविधांमध्ये परिपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उद्याचे भविष्य निर्माण करणारी गुंतवणूक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक ज्ञान वाढले पाहिजे, ते शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांत उतरतील इतकी गुणवत्ता त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवणे आवश्यक आहे, असे ना.जयस्वाल म्हणाले. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, मुरखळाचे सरपंच दशरथ चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश चौधरी, मुख्याध्यापक दौलत घोडाम, शिक्षक शैलेश खंगारे, प्रकाश मुद्दमवार, इतर शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहपालकमंत्र्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांचे शाळेत उत्सवमय पद्धतीने आगमन झाले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी ना.जयस्वाल म्हणाले, शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आज मी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलो आहे. हे दृश्य पाहून मलाही माझ्या शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण झाली. अभ्यासात मन लावा, शिक्षकांचे मनापासून ऐका आणि आपल्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि देशाचा अभिमान वाढवा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
देशाची समृद्धता क्षेत्रफळ किंवा लोकसंख्येवर ठरत नाही, तर ती शिक्षित मनुष्यबळावर अवलंबून असते. शिक्षणाच्या बळावरच आज जगभर भारतीय यशस्वी आहेत. शिक्षणाचा पाया जितका मजबूत, तितके विद्यार्थी सक्षम आणि देशाची ताकद म्हणून भविष्यात समोर येतील असे त्यांनी सांगितले.
जिल्हा समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने सतत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, दळणवळण, रोजगार यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी निधी आणि योजना मंजूर केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हे आपले ध्येय असून हा जिल्हा समृद्ध करायचा आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मंत्री जयस्वाल यांनी दिली.
75 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्याचा सत्कार

मुरखळाच्या ज्या शाळेत कार्यक्रम झाला त्या शाळेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. विशेष म्हणजे शाळेचे 1950 मधील प्रथम विद्यार्थी असलेले वासुदेव मांदाळे हे या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. त्यांचा सहपालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आमदार नरोटे यांनी हाकली बैलगाडी
गोगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेशोत्सवात आमदार डॅा.मिलिंद नरोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सजवलेल्या बैलबंडीत मुलांना बसवत स्वत: बैलगाडी चालवत शाळेत आणले. विद्यार्थ्यांची ही स्वागत फेरी आकर्षणाचे केंद्र ठरली. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, सरपंच राजू उंदिरवाडे, उपसरपंच नलेश दाकोटे, केंद्र प्रमुख रविंद्र मुलकलवार, पोलीस पाटील उत्तम मुनघाटे यांच्यासह शाळा समिती सदस्य, गावकरी उपस्थित होते.
बोदलीच्या शाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत
गडचिरोली तालुक्यातील बोदलीच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार, सरपंच आकाश निकोडे, उपसरपंच मनिषा कुनघाडकर, मुख्याध्यापक ताराचंद आकरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.