देसाईगंज : ओबीसी समाज संघटना, तालुका देसाईगंज यांच्या वतीने ओबीसी मेळावा तथा अभिनंदन सोहळा रविवारी (दि.22) हटवार मंगल कार्यालयात आयोजित केला होता. केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
गेली अनेक वर्षे विविध समाज संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षांच्या वतीने जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा विविध स्तरांवरून जोरदार पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या मागणीची दखल घेत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय देशातील मागास वर्ग, बहुजन, आदिवासी व इतर घटकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

या सोहळ्यात भाजपच्या व इतर पक्षांच्या अनेक दिग्गजांची उपस्थिती लक्षवेधी ठरवणारी होती. यावेळी खा.डॉ.नामदेव किरसान, आ.रामदास मसराम, माजी आ.कृष्णा गजबे यांची उपस्थिती विशेषत्वाने होती. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हा ओबीसी मेळावा आणि अभिनंदन सोहळा भाजपच्या सर्वसमावेशक धोरणांचे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे, अशी भावना यावेळी मा.आ.गजबे यांनी व्यक्त केली.