गडचिरोली : गडचिरोली शहरातून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असताना जड वाहतुकीसाठी बायपास मार्ग तयार करण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून हालचाली थंड आहेत. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. रविवारी शहराच्या इंदिरा गांधी चौकात तीन वेगवेगळे अपघात झाले. यात एका अपघातात दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

लोहखनिजाचा ट्रक सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चामोर्शीकडून धानोराकडे जात असताना आरमोरीकडून धानोरा मार्गाकडे जाण्यासाठी निघालेली दुचाकी ट्रकच्या चाकात सापडली. यात दुचाकीवर मागे बसलेले गणेश वामन चौधरी (रा.मूल) ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक दुसऱ्या बाजुने पडल्याने थोडक्यात बचावले. यानंतर काही वेळ चौकात तणावाचे वातारण पसरले होते. पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि पथकाने परिस्थिती हाताळत पंचनामा करू मृतदेह रुग्णालयाकडे पाठविला.
रविवारी याच इंदिरा गांधी चौकात एका आॅटोचा आणि आणखी एका दुचाकीचा असे दोन अपघात झाले. त्यात एक महिला आणि एक इसम किरकोळ जखमी झाले. त्यामुळे गडचिरोलीत बायपास मार्गाची उभारणी अत्यंत गरजेची झाली आहे. काही वर्षांपूर्वी तो मंजूरही झाला होता. मात्र पुढे त्याचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता ते स्पष्टपणे काहीही सांगण्यास तयार नाही. त्यांच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेमुळे बायपास मार्गाच्या निर्मितीसाठी नेमकी काय अडचण आहे, हे कळू शकले नाही.