आरमोरी : तालुक्यातील गणेशपूर येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व स्थापना महोत्सवाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. युवा गणेश मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत श्रद्धेची अनुभूती घेतली. गोपाळकाला महोत्सवाने या कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

डॉ.अशोक नेते यांचे मार्गदर्शन व सत्कार सोहळा
या भक्तिमय सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी उपस्थित राहून विठ्ठल-रुख्मिणीची पूजा-अर्चा केली. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी असे धार्मिक उपक्रम समाजात आध्यात्मिक उन्नती घडविण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
आजच्या धावपळीच्या जीवनात वारकरी संप्रदायाने दाखवलेला भक्ती, समर्पण आणि संतविचारांचा मार्गच आपल्याला मानसिक शांतता देऊ शकतो. गणेशपूरमध्ये श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या स्थापनेमुळे संपूर्ण गावात भक्तिरसाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. या पवित्र भूमीतून हरिपाठ, भजन-कीर्तन आणि संत विचारांचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. यामुळे सामाजिक ऐक्य आणि अध्यात्मिक उन्नती घडून येईल, असे विचार व्यक्त करत डॉ.नेते यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. अशा धार्मिक उपक्रमांना आपले सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या सोहळ्यात डॉ.अशोकनेते यांना नुकतीच ‘डॉक्टर’ ही मानद उपाधी मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यात गावकऱ्यांनी त्यांच्यावरील विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या पवित्र सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, सरपंच खुशाल वलादे, सामाजिक कार्यकर्ते मुकेश वाघाडे, महादेवराव पिंपळशे़ंडे, खेमराज राऊत, मंगेश चापले, संतदास कोसरे महाराज कढोली, मोंगरकर महाराज, मुरारी वाघाडे, सत्यवान वाघाडे, रमेश मुरमुरवार, विकास पायडलवार, सुरेश फुकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशपूरमध्ये झालेल्या या सोहळ्याने श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला. गावकऱ्यांनी हा उत्सव दरवर्षी भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प केला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेने दिलेला हा अध्यात्मिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित भाविकांनी व्यक्त केला.