आज ऑरेंज अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

सहा तालुक्यांत सरासरीपेक्षा कमीच पाऊस

गडचिरोली : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला असताना जिल्ह्यात आतापर्यंत 501 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस 5 टक्क्यांनी जास्त आहे. शनिवारसाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. दरम्यान भामरागड तालुक्यात एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना आडवी नाली पार करण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. तिला जेसीबीच्या ओंजळीत बसवून नाली पार करावी लागली.

गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 490 मिमी पाऊस बरसून 7 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमान समाधानकारक असले तरी सहा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, तर सहा तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. सर्वाधिक 163 टक्के पाऊस (656 मिमी) सिरोंचा तालुक्यात, आणि सर्वात कमी 72 टक्के (425 मिमी) पाऊस धानोरा तालुक्यात बरसला आहे.

1 जूनपासून आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात तालुकानिहाय पडलेला पाऊस आणि त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. गडचिरोली 464 मिमी (84 टक्के), धानोरा 425 (72 टक्के), देसाईगंज 650 मिमी (129 टक्के), आरमोरी 496 मिमी (108 टक्के), कुरखेडा 545 मिमी (97 टक्के), कोरची 416 मिमी (75 टक्के), चामोर्शी 430 मिमी (118 टक्के), मुलचेरा 521 मिमी (111 टक्के), अहेरी 409 मिमी (86 टक्के), सिरोंचा 656 मिमी (163 टक्के), एटापल्ली 454 (87 टक्के), आणि भामरागड तालुक्यात 541 मिमी (110 टक्के) पाऊस झाला आहे.

दरम्यान गुरूवारी दक्षिण गडचिरोलीच्या सिरोंचा, भामरागड भागात जास्त पाऊस झाल्याने आलापल्ली-भामरागड या राष्ट्रीय महामार्गासह तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सिरोंचा तालुक्यात 24 तासात तब्बल 183 मिमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. पण आपत्ती व्यवस्थापन पथकाने योग्यरितीने परिस्थिती हाताळत नागरिकांना दिलासा दिला.

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी-नाले असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे रस्ता वाहतूक बंद होते. मात्र पर्यायी रस्त्याने किंवा पाणी ओसरल्यावर खराब रस्त्याची डागडुजी करून, कच्चा रस्ता वाहून गेला असल्यास तेथे पुन्हा मुरूम टाकून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले अधिकारी उपस्थित होते.

गरोदर महिला, सर्पदंशाचे रुग्ण किंवा वीज अपघात झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागते. अशावेळी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असणे आवश्यक आहे. विशेषतः आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या भागात विशेष लक्ष देण्यात यावे. सिरोंचा ते तेलंगणा मार्गावरील पुलाचा पोहचरस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील परिस्थितीचा विचार करून रुग्णांना इतरत्र रेफर करावे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी आपत्ती ओढवली असेल तेथे स्थानिक यंत्रणेने स्वतः हजर राहावे, आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नागरिकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी. तहसीलदार यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घ्यावे, तसेच जीवित हानी झाली असल्यास त्यासंबंधी मृतकाच्या वारसांना व पशुधन मालकांना शासकीय मदतनिधी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.