‘जो वादा किया वो निभाना पडेगा..’ वडलापेठ भागातील नागरिकांचा सूर

'सुरजागड इस्पात'ची जनसुनावणी

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पहिलाच मोठा उद्योग असणाऱ्या वडलापेठ येथील प्रस्तावित ‘सुरजागड इस्पात’ या लोह प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवार, दि.25 मार्च रोजी उत्साहात पार पडली. रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, शैक्षणिक प्रगती अशा अनेक अंगांनी प्रगतीची दारं उघडणाऱ्या या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे वडलापेठ परिसरातल्या गावांमधील नागरिकांनी या प्रकल्पाचे समर्थन केले. मात्र कंपनीच्या वतीने सुरूवातीला सादरीकरणाच्या वेळी नागरिकांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करण्याचा वादा केला तो जरूर पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लॅायड्स मेटल्सनंतर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पाऊल ठेवणारा ‘सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड’ हा दुसरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुरू करताना पर्यावरणाची हाणी होणार नाही यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील आणि त्या भागातील नागरिकांना त्याबाबत काय वाटते हे जाणून घेण्यासाठी दि.25 ला ही पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणीची बैठक पार पडली. नियोजन भवनात जागा अपुरी पडेल याची कल्पना असल्याने बाहेर सुद्धा मंडप टाकून मोठ्या पडद्यावर आतील चर्चा पाहण्याची सोय केली होती. या बैठकीत वडलापेठ व परिसरातील गावांमधून आलेल्या नागरिकांनी सुरजागड इस्पात कंपनीचे स्वागत केले. सोबत चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांवर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य अश्या विविध समस्यांवर खुली चर्चा झाली. त्या समस्या सोडविण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीकडून सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे कंपनीला सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी दिशा मिळाली.

या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॅा.देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, भाजपचे नेते रविंद्र ओल्लालवार, बबलू हकीम, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॅा.सोनल कोवे, हनमंतू मडावी, तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम, कंपनीचे संचालक वेदांश जोशी, बलराम सोमनानी, डॅा.चरणजीतसिंग सलुजा, खमणचेरुचे सरपंच सायलू मडावी, रामलुक उडम, पराग ओलालवार, तुळशीराम मडावी, शशिकला काटमवार, दिलीप चौधरी, निरंजन दुर्गे, माजी सरपंच रमेश पेंदाम, माजी सरपंच रमेश मडावी, संतोष आत्राम, ललिता मडावी, सोनाली कोवे, अमृता रॉय यांच्यासह परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.