गडचिरोली : श्रीराम नवमी (26 मार्च) व हनुमान जयंती (2 एप्रिल) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, तसेच नक्षल चळवळीच्या टी.सी.ओ.सी. कालावधीत संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये हा आदेश जारी केला आहे. तो दि.22 मार्चच्या मध्यरात्री पासून ते 5 एप्रिल 2026 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, स्फोटक पदार्थ, दगडफेक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मिरवणुका, सभा, आंदोलने यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
































