कारणं सांगू नका, कामं वेळेत पूर्ण करा, बांधकाम विभागावर धर्मरावबाबा खवळले

गडचिरोलीत घेतला अहेरी भागाचा आढावा

गडचिरोली : जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरूस्त करावे. रस्ते बांधकामाची मंजुरी असताना, निधी उपलब्ध असताना ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करून अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

अहेरी मतदार संघातील विकास कामांचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी (दि.2) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने, सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, अहेरीचे उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी पाचकवडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांना विलंब होत असण्यामागे विविध कारणे देण्याचा प्रयत्न केला, पण धर्मरावबाबा यांनी मला कारणे देऊ नका, रिझल्ट द्या, असे म्हणत कंत्राट घेतला आहे तर तो वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यामुळे कामाच्या विलंबासाठी कंत्राटदारांसोबतच त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारीही जबाबदार असल्याचे सांगत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांची काढलेली खरडपट्टी चर्चेचा विषय झाली आहे.

आलापल्ली, लगाम, गोमणी, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपनपल्ली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे. लगान ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची सुरूवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामांमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी होत असून याबाबतीत कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री आत्राम यांनी दिला.

अहेरीत होणार ब्लड बँकेची इमारत

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यासाठी अहेरी येथे ब्लड बँकेची सुसज्ज इमारत उभारणार असून त्यासाठी 1 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ब्लडबँक सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर देण्याचे सांगताना पेसा क्षेत्रातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करणे, मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन देण्याचे व शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: दुर्गम भागात भेट देवून याची तपासणी करण्याचे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची भरती करणे, पाणीपुरवठा योजनेच्या बंद पडलेल्या सोलर प्रणाली प्राधान्याने दुरूस्त करणे, सिरोंचा येथील खताचा 1200 मे.टन बफर साठा शेतकऱ्यांसाठी खुला करणे, पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे, आदी सूचना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी रस्ते बांधकामाची कामे करताना तांत्रिक बाबी तपासून गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, बलवंत रामटेके, तसेच महावितरण, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, अहेरी विधानसभा मतदान क्षेत्रातील तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर आदि उपस्थित होते.