आलापल्ली येथे भक्तिमय वातावरणात सहजयोगाची श्रीगणेश पुजा संपन्न

अध्यात्मिक उन्नती करता येते- अम्ब्रिशराव

अहेरी : श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ध्यान साधना केंद्र अहेरी विभागाची श्रीगणेश पुजा आलापल्ली येथील परमेश्वरी कन्यका मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या पुजा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम होते.

यावेळी सहजयोग ध्यान केंद्र कमिटीतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी मोठ्या श्रद्धेने माताजी निर्मलादेवी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले. श्रीगणेश पूजास्थळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ध्यान साधना केल्याने आपण आपल्या जीवनातील ताण-तणावांपासून मुक्त होतो. आपला व्यक्तिमत्त्व विकास होतो. आपलं जीवन सुखी व समाधानी होते. सहजयोगाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती साधता येते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

श्रद्धा व भक्तिमय वातावरणात सहजयोगाची श्रीगणेश पुजा मोठ्या उत्साहात झाली. याप्रसंगी सहजयोग अहेरी विभागाचे प्रमुख राजू तेलामी, ज्योती ताजने, चक्रधर कावळे, अनिल अनमूलवार, शिवराज ताजने, गणेश गारघाटे, जम्पलवार तसेच भामरागड, एटापल्ली, मूलचेरा, आलापल्ली, आष्टी आणि सिरोंचा येथील सहजयोग ध्यान केंद्रांचे प्रमुख, तसेच मोठ्या संख्येने साधक (सहजयोगी) उपस्थित होते.