कठीण प्रसंगांना तोंड द्याल तरच यशाचे शिखर गाठाल

आ.कृष्णा गजबे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

देसाईगंज : आजचा विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सुसंस्कृत बनून आपल्या शाळेचा लौकिक वाढविण्याच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. जीवनात जितके कठीण प्रसंग येतील त्या प्रसंगांना आपण तोंड दिले पाहिजे, तेव्हाच यशाचे शिखर गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

१५ जुलैला येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या शैक्षणिक सत्रात प्राविण्य प्राप्त करणारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोतीलाल कुकरेजा होते.

प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॅा.परशुराम खुणे, तर प्रमुख अतिथी म्हणून नुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष केवळराव घोरमोडे, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, तसेच मुरलीधर दुपारे, ओमप्रकाश अग्रवाल, साधना सपाटे, अ.जहीर अ.हमीद शेख, संतुमल डोडाणी, अतुल उईके, डॉ. इंदरप्रीतसिंग तुटेजा, योगेश नाकतोडे, प्राचार्य शंकर कुकरेजा, मुख्याध्यापक डी.डी. शिंगाडे, दादाजी भर्रे, सेवानिवृत्त कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक तथा विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.