प्रवासी घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात, महिला व पुरूष ठार

तेरवीला जाणारे 24 जण जखमी

गडचिरोली : प्रवाशांना घेऊन मुलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोलेरो पिकअप या मालवाहू वाहनाचे रेंगेवाही पुलाजवळील वळणावरून नियंत्रण सुटून हे वाहन झाडावर जाऊन धडकले. यात दोन जणांना जीव गमवावा लागला, तर 24 जण जखमी झाले आहेत. हे सर्व लोक चंद्रपूरच्या पोंभुर्णा तालुक्यातील भटाळी आणि देवई गावातील रहिवासी आहेत.

ईश्वर जगन्नाथ कुसराम (54 वर्ष) आणि रंजिता सुधाकर तोडासे (42 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व लोक बोलेरो पिकअप वाहनाने (एम एच 40-एके-6616) बंदुकपल्लीकडे निघाले असताना आष्टी ते मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही पुजाजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे वाहन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळले आणि नंतर प्रवासी बसलेल वाहनाचा मागील भाग निघून तो रस्त्यालगत उलटला.

या वाहनात 4 ते 5 लहान मुले आणि जवळपास 15 महिला होत्या. त्यातील 24 जण गंभीर जखमी असून सर्वांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविले आहे.