अहेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 11 वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, अहेरी तालुक्याच्या वतीने ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन अहेरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते होते.
यावेळी मा.खा.डॉ.नेते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसुत्रीच्या मार्गावर चालत एक नवीन भारत उभा केला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रातून जनतेच्या मनात विश्वासाचं नवं पर्व सुरू झालं आहे. मी सलग 10 वर्षे लोकसभेत काम करत असताना मोदीजींचे नेतृत्व जवळून पाहिले. त्यांच्या कर्तृत्वाचा अनुभव घेताना मला संसदेमध्ये देशसेवेचा अभिमान वाटला. ज्या गोष्टी काँग्रेसने 60 वर्षांत पूर्ण केल्या नाहीत, त्या मोदी सरकारने केवळ 11 वर्षांत साकारल्या, असे डॅा.नेते म्हणाले.

भारताची अर्थव्यवस्था आज जगात चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा भक्कम करणं हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य असल्याचं मा.खा.नेते म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे, जसे रेल्वे प्रकल्प, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, चिचडोह व कोटगल बॅरेज,
एकलव्य विद्यालय, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आदी कामांचा उल्लेख केला.
‘संकल्प ते सिद्धी’ हा उपक्रम केवळ माहितीचा नाही, तर कार्यकर्त्यांच्या कृतीला दिशा देणारा प्रेरणास्त्रोत आहे. प्रत्येक गावात मोदी सरकारची कामगिरी पोहोचवण्याचा संकल्प आपण घेतला असल्याचे मा.खा.डॉ.नेते म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुतरमारे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, नगरसेवक अमोल गुड्डेलीवार, विकिस ऊईके, मुकेश नामेवार, शालिनी पोहनेकर, सागर डेकाटे, पोशालु चौधरी, महिला व युवा मोर्चाचे पदाधिकारी, मंडळ संयोजक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.