गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसुत्रीच्या माध्यमातून सरकारने केलेल्या संकल्पांची सिद्धी झाली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 50 वर्षात न झालेली विकास कामे गेल्या 11 वर्षात झाली आहेत, असा दावा माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केला. (सविस्तर बातमी खाली वाचा)
केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने या काळात झालेल्या कामांना उजाळा देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी झालेले महत्वपूर्ण निर्णय, जनहितकारी योजना आणि आगामी दिशादर्शक उपक्रम याविषयी सविस्तर माहिती सादर करण्यात आली. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, आदिवासी आघाडीचे जिल्हा नेते डॉ.नितीन कोडवते, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अनु.जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड.उमेश वालदे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, कामगार आघाडीचे प्र.सचिव गोवर्धन चव्हाण, विलास भांडेकर, आनंद खजांजी, सलीम शेख, अॅड.विजय चाटे, विनोद देवोजवार, रमेश नैताम, किर्तीकुमार मासूरकर, श्याम वाढई, प्रशांत अल्लमपटलावार, तसेच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.खा.डॉ.नेते यांनी सांगितले की, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रातून देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा थेट लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अभूतपूर्व निर्णयांमध्ये कलम 370 हटविणे, तीन तलाक बंदी, राम मंदिर निर्माण, सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर, कोरोनाच्या संकटावर मात हे निर्णय मोदी सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘वंदे भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ अशा उपक्रमांनी नवी ओळख घडवली आहे.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या महत्वपूर्ण निर्णयांमध्ये रेल्वेमार्गाची प्रत्यक्ष उभारणी आणि नवीन रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण, मेडिकल कॅालेज, गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, चिचडोह-कोटगल बॅरेज, अनेक पुल-कम बंधाऱ्यांचे प्रस्ताव अशा अनेक कामांचा उल्लेख डॅा.नेते यांनी केला.