गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकाव्यात आणि त्याचे निराकरण करावे, यासाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सेमाना देवस्थानात शुक्रवारी महायज्ञ करण्यात आला. दरम्यान महायज्ञ आटोपताच मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यामुळे हा योगायोग होता की महायज्ञाची फलश्रुती, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगली. (सविस्तर बातमी खाली वाचा)

सेमाना देवस्थानात दुपारी 12 वाजता झालेल्या या महायज्ञात खासदार डॅा.नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आ.रामदास मसराम, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अॅड.सचिन नाईक, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा.नाट, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, पप्पू हकीम, रजनीकांत मोटघरे, राजेश ठाकूर, रुपेश टिकले, दामदेव मंडलवार, दत्तात्रय खरवडे, अब्दुलभाई पंजवानी, भूपेश कोलते, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महायज्ञातील प्रमुख मागण्या
1. गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्ती, वाघ, अस्वल, रानडुक्कर यांच्यामुळे जीवित आणि पिकांची हाणी होत आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. नुकसानभरपाई 50 हजारावरून, 1 लक्ष रुपये करण्यात यावी.
2. जड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहराबाहेरुन बायपास मार्ग करण्यात यावा. तोपर्यंत शहरातून खनिज वाहतूक करू नये.
3. शेतकऱ्यांना सोलर पंपची सक्ती केली पण ते त्वरित लावून देण्यात येत नाही. ते बंद पडल्यास कंपनीकडून सेवा मिळत नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच डिमांडची रक्कम भरली आहे त्यांना वीज जोडणी देण्यात यावी आणि डिमांड रकमेचा परतावा देणे बंद करावे.
4. शेतकर्यांना प्रतिहेक्टरी बोनस जाहीर करण्यात आला होता, परंतु अजूनही बोनस देण्यात आलेला नाही, तो बोनस त्वरित देण्यात यावा.
5. उद्योग स्थापनेच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी केल्या जात आहेत. या प्रकरणांची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा.
6. प्रस्तावित असलेल्या विमानतळाकरिता सुपीक शेत जमिनी अधिग्रहीत न करता त्याऐवजी शहरालगत असलेल्या सायन्स कॉलेजच्या शेजारील पडीत व झुडपी जंगलाची जमीन अधिग्रहीत करावी.
7. जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम संथगतीने सुरु असून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावे. सोबतच जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी.
यासोबत इतरही अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.