गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मागील तीन वर्षापासून स्वतःकडे घेतली असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होत नसल्याचे सांगत काँग्रेसने गुरूवारी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक हेलिकॅाप्टर देण्याचे अनोखे आंदोलन केले. ‘हेलिकॉप्टर’ घ्या, पण गावाला, तालुक्याला येऊन समस्या जाणून घ्या, असा या आंदोलनाचा सूर होता.
वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही आर्थिक मदत मिळाली नाही, रानटी हत्तींचा उपद्रव सुरू असताना त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही, अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, रस्त्यांची झालेली अवस्था यामुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने मोठा गाजावाजा करून शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत तर केले, मात्र त्याच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता चांगल्या सुरक्षित बसेस नाहीत, शेतकरी, नागरिकांना छोट्यामोठ्या समस्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात मात्र त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही, अनेक कंत्राटदारांचे शासकीय कामांचे देयके थकीत आहेत, पावसाळा सुरू झाला तरीही बऱ्याच घरकुलधारकांना रेती मिळाली नाही, त्यांची देयके थकीत आहेत, मनरेगाचे पैसे अजून प्रलंबित आहेत, जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे, अशा अनेक मुद्द्यांकडे या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन जनतेची दुःखं समजून घ्यावी ही अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत येणे आणि नागपूरला परत जाणे, हीच भूमिका पालकमंत्र्यांची आहे. जिल्ह्यातील प्रमुख पदावर बसलेल्या प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांना सु्द्धा सर्वसामान्य जनतेला भेटायला वेळ नाही, साहेब व्हीसी किंवा बैठकीत व्यस्त राहात असल्याने सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुरावा वाढत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
हेलिकॅाप्टर घ्या पण गावाला किंवा तालुक्याला या, असे म्हणत विविध कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती आणि निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह आरमोरीचे आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तसेच तालुक्यांचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे अध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपये टिकले, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, घनश्याम वाढई, रमेश चौधरी,अनिल कोठारे, दिलीप घोडाम, भैय्याजी मुद्दमवार, नंदू नरोटे, गुलाब मडावी यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी, महिला, युवक यावेळी उपस्थित होते.