विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

बुर्गीच्या कार्यकर्ता मेळाव्याला उसळली गर्दी

एटापल्ली : महायुतीच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महायुती सरकारने केवळ योजनांची घोषणाच केली नाही तर त्या-त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला आहे. नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दोन महिन्यांची रक्कम देखील भगिनींच्या खात्यात जमा केली आहे. मात्र विरोधकांकडून ही फसवी योजना असल्याचा अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तालुका अध्यक्ष श्रीकांत कोक्कुलवार, सरपंच विलास गावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडुके, रामजी कत्तीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुगद उराडे, पंचायत समितीचे माजी सभापती बेबी नरोटे, पं.स.चे माजी उपसभापती जनार्धन नल्लावार, जारावंडीच्या सरपंच सपना कोडापे, ललिता मडावी, मालू पाटील गावडे, गोसू पाटील हिचामी, नगर सेवक रमेश टिकले, लक्ष्मण नरोटे, गेदाचे उपसरपंच दसरू मट्टामी, कैलास कोरेत, सांबय्या करपेत तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री आत्राम म्हणाले, विरोधक निवडणुका आल्या की येतात आणि भाषण ठोकून जातात. मग पाच वर्ष त्यांचा पत्ताच राहात नाही. सत्ता येते अन जाते. आपल्या लोकांसाठी कोण काम करतो, आपल्यासाठी संकटात कोण धाऊन येतो याचा आता विचार करणे गरजेचे आहे. देशात मोदी आहेत तर राज्यात परत एकदा महायुती सरकार येणार असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आणि समाजाची उन्नती करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा पाढाच त्यांनी वाचून दाखविला. परत एकदा मोठ्या मताधिक्याने ना.धर्मरावबाबा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात बुर्गीसह परिसरातील विविध गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जणूकाही कार्यकर्त्यांचा कुंभमेळाच भरला होता. यावेळी पक्षाकडून कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही याची आयोजकांनी पुरेपूर काळजी घेतली. बुर्गी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोमनाथ पुरी आणि त्यांच्या चमूकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

बुर्गी गावात आगमन होताच बुर्गीसह इतर गावातील आदिवासी बांधवांनी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशे आणि आदिवासी नृत्य, तसेच रेला नृत्य करून जंगी स्वागत केले.