निवडणुकीच्या कामाला लागा, धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

अनेकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना केले. ते शुक्रवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

यावेळी मंचावर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

पुढे बोलताना धर्मरावबाबा म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळविणे हे माझे ध्येय आहे. उमेदवार गरीब जरी असला पण नेतृत्ववान आणि कर्तृत्ववान असला तर त्याला निवडून आणण्यासाठी सर्व पाठबळ देण्यासाठी मी तत्पर असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले. यावेळी बबलू हकीम, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतून रांगोळीतून साकारण्यात आलेले धर्मरावबाबा आत्राम यांचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी तर संचालन रतन दुर्गे यांनी केले. यावेळी अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

गुरुवारी दुपारी गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात प्रामुख्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. या सर्व मृतात्म्यांना बैठकीच्या प्रारंभी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.