गडचिरोलीत आज काँग्रेसचा शेतकरी मेळावा व न्याययात्रा

प्रदेशाध्यक्ष सपकाळ प्रथमच येणार

गडचिरोली : काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज गडचिरोलीतील अभिनव लॅानमध्ये शेतकरी मेळावा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पहिल्यांदाच गडचिरोलीत येणार असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा ‘शेतकरी न्याय यात्रे’त सहभागी होणार आहेत. यात 10 हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

आज दि.12 जून रोजी, दुपारी 12 वाजता अभिनव लॅान येथे होणारा शेतकरी मेळावा आणि पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे. या शेतकरी न्याय यात्रेत खासदार डॉ.नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार प्रशांत पडोळे, खासदार बळवंत वानखेडे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, माजी खा.मारोतराव कोवासे, आ.रामदास मसराम, आ.अभिजीत वंजारी, आ.सुधाकर अडबाले, निरीक्षक सचिन नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

या शेतकरी मेळाव्यास व शेतकरी न्याय पदयात्रेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, युवक, महिला, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

अशा राहणार पदयात्रेतील प्रमुख मागण्या

– गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रानटी हत्ती, वाघ, अस्वल, रानडुक्कर यांचा वावर वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी व शेत पिकाचे नुकसान होत आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई 50 हजारवरून, 1 लक्ष रुपये करण्यात यावी.

– शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी बोनस जाहीर केला होता, तो बोनस तातीने देण्यात यावा.

– अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक भरपाई दिली जावी.

– शेतकऱ्यांना सोलर पंपची सक्ती करू नये, ज्या शेतकऱ्यांनी पूर्वीच डिमांडची रक्कम भरली आहे त्यांना वीज जोडणी देण्यात यावी.

– जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळाकरिता सुपीक शेतजमिन अधिग्रहीत न करता त्याऐवजी शहरालगत असलेल्या सायन्स कॉलेजच्या शेजारील पडीक व झुडूपी जंगलाची जमीन अधिग्रहीत करावी.

– उद्योग स्थापनेच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी केल्या जात आहेत. या प्रकरणांची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा.

– वनपट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांना सात पिढ्यांची अट शिथिल करून कायमस्वरूपी वनपट्टे द्यावेत.

– जड वाहतुकीमुळे अपघात टाळण्यासाठी शहराबाहेरुन बायपास मार्ग करण्यात यावा. तोपर्यंत शहरातून खनिज वाहतूक बंद ठेवण्यात यावी.

– सुरजागड व लॅायड्स मेटल्सच्या कोनसरी प्रकल्पामध्ये किमान 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या द्याव्या, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी.

– पावसाळ्यात गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या अतिविसर्गाने व मेडीगट्टा धरणातील बॅकवॉटरमुळे दरवर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे व गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.

– जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.