मी शांत आहे, वाघाने डरकाळी फोडली तर शेळ्या-मेंढ्या धूम ठोकतील

कार्यकर्ता मेळाव्यात धर्मरावबाबा गरजले

अहेरी : प्रवाहाच्या दिशेने तर सगळेच पोहतात, पण प्रवाहाला चिरत विरूद्ध दिशेने पोहणारा नेहमीच लक्ष्यवेधी ठरतो. मी पण तेच केले आणि त्यामुळेच आज तुमच्या पुढे उभा आहे. मी शांत आहे, मला शांतच राहू द्या. वाघाने डरकाळी फोडली तर शेळ्या, मेंढ्या धूम ठोकतील, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधकांना उद्देशून दिला. यावेळी त्यांनी विरोधकांना धूळ चारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले.

बुधवार दि.4 सप्टेंबर रोजी अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ना.आत्राम अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षावर्धनबाबा आत्राम, अहेरीचे माजी सरपंच रामेश्वरबाबा आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आशा पोहनेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, इंदारामचे माजी सरपंच नामदेव आत्राम, राकाँचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, पंचायत समितीचे माजी सदस्य सोमाजी झाडे, अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सिरोंचाचे नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक विलास सिडाम, महेश बाकीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.आत्राम म्हणाले, अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी एकच खुर्ची आहे, मात्र त्या खुर्चीसाठी प्रयत्न करणारे अनेक जण आहेत. आता प्रत्येकाला खुर्चीची ओढ लागली आहे. निवडणूक आली की सर्वजण बाहेर पडत आहेत. यंदा काही नवीन चेहरे देखील मैदानात उतरणार आहेत. लोकशाही असल्याने प्रत्येकाला संधी आहे. विरोधक बरेच ठिकाणी टीका करताना दिसतात. काही लोकांनी तर आपली पातळी सोडली. मला पण बोलता येते, मात्र जरा धीर धरा, असे म्हणत धर्मरावबाबा यांनी आपला राजकीय कार्यकाळच सांगितला. राजे विश्वेश्वरराव महाराजांचा एक काळ होता. त्यांच्या इशाऱ्यावर लोकं चालायचे. 1990 मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि जिंकून पण दाखविली. काही लोकं सण, उत्सवात देखील मंचावरून राजकारण करत टीका करीत आहेत. विकास कामांवर चर्चा करायची असेल तर आकडेवारी घेऊन समोरासमोर या, असे खुले आव्हानच धर्मरावबाबांनी दिले.

यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी देखील मार्गदर्शन करताना मिशन 2024 साठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे यांनी, तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. धर्मरावबाबा यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत, पुष्पगुच्छ देऊन त्या सर्वांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा उद्या आलापल्लीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील जनसन्मान यात्रा शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजतादरम्यान आलापल्ली येथील क्रीडा संकुलात शेतकरी आणि लाडक्या बहि‍णींशी संवाद साधला जाणार आहे. तत्पूर्वी नागेपल्ली येथे सकाळी 11.15 वाजता महिलांशी संवाद आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम रेड्डी कॅाम्प्लेक्स, अहेरी रोड येथे होणार आहे. यावेळी ना.पवार यांच्यासोबत ना.धर्मरावबाबा आत्राम आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित राहतील.

ना.धर्मरावबाबा दि.5 ते 8 सप्टेंबरदरम्यान अहेरी दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.