राज्याच्या शेवटच्या टोकावरील गावात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जनसंवाद

समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी

अहेरी : सर्वसामान्य लोकांनी निवडून दिल्यानेच मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. मंत्री झालो म्हणून मुंबईत बसून काम चालणार नाही. ज्या सर्वसामान्य जनतेनी विश्वास दाखवून मला आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. जनतेत गेल्याशिवाय समस्या कळणार नाही. त्यामुळेच आपल्यापर्यंत आलोय. तुम्ही समस्या सांगा, त्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे, अशा शब्दात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दामरंचा या गावातील नागरिकांना दिलासा दिला.

महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील इंद्रावती नदीच्या काठावर असलेल्या अहेरी तालुक्यातील दामरंचा या गावात अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं. स. सदस्य रामेश्वरबाबा आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ता मलय्या साकेट, हनमंतू आलाम, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, कैलास कोरेत, माजी पं.स. सदस्य मांतय्या आत्राम, पोलीस पाटील विश्वनाथ आलाम, माजी पं.स. सदस्य राकेश पनेला, माजी सरपंच पापय्या सुरमवार, माजी सरपंच जिलकरशाही मडावी, बाबुराव तोरेम, सुधाकर कन्नाके, रवी सुरमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, दामरंचा परिसर देखील दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो किंबहुना राज्याच्या शेवटच्या टोकावरील हे गाव आहे. त्यामुळे सर्वांना माझी भेट घेण्यासाठी अहेरी येथे येणे शक्य होत नाही. त्यामुळेच मी स्वतः आपल्या भेटीसाठी आलो आहे. यावेळी उपस्थितांनी चर्चेच्या माध्यमातून या भागातील समस्या मांडल्या. त्यात विजेची समस्या, मोबाईल नेटवर्कची समस्या, काही आदिवासी लोकांना जातीचे दाखले नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच लिफ्ट इरिगेशनचे बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असेही धर्मरावबाबांनी सांगितले. या मेळाव्यात दामरंचा, मांडरा, रुमालकसा, तोंडेर, चिंतारेव, चिटवेली, वेलगुर, भंगारमपेठा, कोत्तापेठा, कोयागुडम, मोदुमडगू आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दामरंचा येथे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कोरेत यांनी केले.