Home राजकीय घडामोडी कोरची तालुक्यात राष्ट्रवादीला साथ दिल्यास क्षेत्राचा कायापालट करणार

कोरची तालुक्यात राष्ट्रवादीला साथ दिल्यास क्षेत्राचा कायापालट करणार

आ.धर्मरावबाबा आत्राम यांचे आश्वासन

कोरची : कोरची तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून डोंगर-पहाडाने वेढलेला आहे. मी या तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले, पण अजूनपर्यंत या तालुक्याचा विकास झाला नाही. तालुक्यातील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात द्या, मी या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि अतिक्रमणाचे पट्टे मिळवून देण्यासोबतच या तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न करत राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्याच्या आढावा बैठकीत नागरिकांना उद्देशून केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील गोटूल भवनामध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आढावा बैठकीला माजी आमदार डॅा.रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, माजी जि.प.सभापती नाना नाकाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेचे सभापती लीलाधर भरडकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले, सुनील नंदनवार, रिंकू पापडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.धर्मरावबाबा म्हणाले, या तालुक्यातील आदिवासींवर काँग्रेस व भाजपाकडून नेहमीच अन्याय करण्यात आला आहे. या क्षेत्रातील नेत्यांची दोरी ‘वारां’च्या हातात आहे, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करणार, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरची तालुक्यातील दोन जि.प. आणि चार पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यास येथील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा व अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असेही ते म्हणाले.

आढावा बैठकीचे संचालन राजू सहारे यांनी, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अनिल किरामी यांनी केले. कार्यक्रमाला कोटरा बिहिटेकला व कोरची कोटगुल जिप क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आविस व ग्रामसभांचे पदाधिकारी तथा सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.