निवडणुकीतील उमेदवारांसाठी शेतकरी कामगार पक्षाचा अनोखा जाहीरनामा

लेखी सहमती दिली तरच देणार समर्थन

गडचिरोली : देशपातळीवरील इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी वेगळी भूमिका मांडली आहे. शेकापने आपल्या काही मागण्या समोर केल्या आहेत. निवडून आल्यास त्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात जो पक्ष लेखी सहमती देईल, त्या पक्षाच्या उमेदवाराच आपल्या पक्षाचा पाठिंबा राहील, असे शेकापच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जनतेच्या ज्वलंत मुद्यांची जाणीव करून देवून ते मुद्दे ज्या उमेदवाराला मान्य असतील अशा लोकशाही, संविधान समर्थक उमेदवारासाठीच काम करावे, असा रेटा शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चालविला आहे. शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीतील घटक असतानासुद्धा काही मु‌द्यांवर संविधान आणि लोकशाही समर्थक उमेदवाराची लेखी संमती मिळावी अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.

शेकापने वेधले या मागण्यांकडे लक्ष

शेकापला सहमती हव्या असलेल्या मुद्द्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पुन्हा 6 वरून 19 टक्के करावे, या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या ढिवर, केवट, कहार, भोई व तत्सम भटक्या जमातींचे (ब) (NT-B) आरक्षण 5 टक्के करण्यात यावे, जिल्ह्यात 5 वी आणि 6 वी अनुसूची लागू करून पूर्ण अनुसूचित क्षेत्र असलेल्या तालुक्यांची स्वतंत्र स्वायत्त जिल्हा परिषद मंजूर करण्यात यावी, काँग्रेस सरकारच्या काळात प्रस्तावित व मंजूर झालेल्या आणि भाजप सरकारच्या काळात खोदण्यात येत असलेल्या सर्व लोहखाणी कायमस्वरुपी रद्द कराव्या, कलम 110, 107 रद्द करण्यात यावे, राज्य सरकारने शेतकऱ्यांना बारमाही 24 तास मोफत वीज पुरवठा देणारा कायदा करावा, जिल्ह्यातील वनसंपदेवर आधारीत उ‌द्योगनिर्मिती करून तरुणांना रोजगार देण्यासाठी F-SEZ तयार करण्यात यावा, मोहफुलापासून मद्यनिर्मितीला चालना देऊन मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘मोहफुलाच्या दारुला’ पारंपरिक दर्जा देण्यात यावा, स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत 80 टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात यावा, नदी काठावरील गावाच्या ग्रामसभांना रेती उत्खनन व विक्रीचे अधिकार देऊन उत्पन्न आणि रोजगाची संधी द्यावी, जिल्ह्यात गोंडी भाषिक प्राथमिक शाळा सुरु कराव्यात, पटसंख्येच्या कारणाने दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचे धोरण रद्द करावे, आरोग्य, शिक्षणासह सर्व विभागांतील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी.