सिरोंचातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले उपोषण सात दिवसानंतर घेतले मागे

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची शिष्टाई

सिरोंचा : तहसील कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होते. माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथे येऊन आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आंदोलकांचे समाधान झाल्याने त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना आत्राम यांच्या हस्ते लिंबूपाणी पाजून हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी तथा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.