गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करु नये, उष्माघात टाळण्यासाठी दिलेल्या उपायांचा अवलंब करुन आवश्यक खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
उष्माघाताची सर्वसाधारण लक्षणे
* जेष्ठ नागरिकांमध्ये मानसिक संवेदनशिलता, दिशाहीनता, संभ्रम, गोंधळ, चिडचिडपणा, झटका येणे, थकवा जाणवणे.
* गरम लाल कोरडी त्वचा, अत्याधिक तहान लागणे.
* मुख्य शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढणे.
* तीव्र डोकेदुखी, चिंता, चक्कर येणे, बेशुध्द पडणे आणि अशक्तपणा जाणवणे.
* मळमळ आणि उलटी होणे.
* हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, प्रवास लागणे.
मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे
* भूक न लागणे, अत्याधिक चिडचिड होणे.
* लघवी न होणे, डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवणे.
* सुस्ती येणे, मानसिक संभ्रमासारखी स्थिती होणे.
* झटका येणे, शरीराच्या कोणत्याही ठिकाणाहून रक्त वाहणे.
सावध रहा, स्वतःची काळजी घ्या
* एकटे राहणाऱ्या वृध्द किंवा आजारी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा.
* शरीराला थंडावा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपडयांचा वापर करा.
* तुमच्या घराला थंड ठेवा, रात्री पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि खिडक्या उघड्या ठेवा.
* दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करा.
आहारासंबंधी घ्यावयाची काळजी
* अधिक प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
* दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, कारण ते शरीराला हानी पोहोचवू शकतात.
* स्वयंपाक करायची जागा हवेशीर करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा.
बाहेर फिरायला जाताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
* पिण्याचे पाणी / ज्युस सोबत ठेवा आणि हायड्रेटेड रहा.
* पातळ, सैल, सुती कपडे घाला.
* सुर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री / टोपी / टॉवेल आदींनी आपले डोके झाका.
* अनवाणी बाहेर जाऊ नका.
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तींची अशी मदत करा
* संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे.
* शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा.
* शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घाला, सावलीच्या ठिकाणी झोपवुन कपडे सैल करावीत.
* तापमान कमी करण्यासाठी त्याला द्रव पदार्थ द्यावे, थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.
शरीराचे तापमान वाढलेले, बेशुध्द, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास 108 किंवा 102 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णास दाखल करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उष्माघात कक्षही स्थापन करण्यात आला आहे.