मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम येत्या १५ दिवसात मार्गी लागणार

खासदार नेते व जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रखडलेले काम येत्या १५ दिवसात मार्गी लागून सुरू केले जाईल आणि लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या चामोर्शी, मार्कंडा परिसरातील भाविक नागरिकांना दिली.

मंदिराचे रखडलेले काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी चामोर्शी येथील सुनील शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज यांच्यासह अनेक भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून अन्नत्याग आंदोलनाची तयारी केली होती. मात्र यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीना यांनी या नागरिकांची भेट घेऊन त्यांना या कामासाठी पुरातत्व विभागाकडे वारंवार कसा पाठपुरावा सुरू आहे आणि या कामाची सध्याची स्थिती काय आहे हे समजावून सांगितले.

यावेळी खा.नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्षांपूर्वीचा राम मंदिराचा प्रश्न निकाली लावला. त्याचप्रमाणे मार्कंडा देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी आणि त्या परिसरातील विविध सोयीसुविधांसाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या नियमावलीमुळे मंदिरालगत कोणतीच कामे करता येत नाही. असे असले तरी या मंदिराच्या संपूर्ण विकासाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे खा.नेते म्हणाले.

मंदिराच्या मटेरियल व लेबर टेंडरपैकी मटेरियल टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लवकरच लेबर टेंडर पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. केंद्र सरकारच्या नियोजनानुसार देशातील सर्वच श्रद्धास्थानांचा विकास झपाट्याने सुरू आहे. पुरातत्व विभागातील प्रशासकीय अडचणींमुळे मार्कंडेश्वर मंदिराचे काम थांबले होते. परंतु या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक घेऊन हे काम मार्गी लावण्यात आले आहे. माझ्या गावातही महाशिवरात्रीची जत्रा भरते. त्यामुळे लहानपणापासून मी महादेवाचा भक्त असून पुरातत्व विभागाकडे पुढेही सातत्याने पाठपुरावा करून मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आणि तेथील सर्व सुविधांचे काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही यावेळी खा.नेते यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या आवाहनानुसार, अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात आला.

यावेळी सुनिल शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज, मनिष महाराज, पुंडलिक नेवारे महाराज, इस्कॉनचे परमेश्वर प्रभू, पिपरेजी महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, भाजपा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, राकेश बेलसरे, भास्कर बुरे, तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते.